वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश करा, अन्यथा आंदोलन !
नागपूर : वाशिम जिल्ह्यात सिंचन व्यवस्था फक्त ५ ते ७ टक्के आहे. जिल्ह्यात सिंचनाची भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे नियोजित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्यालाचा समावेश करावा,अशी मागणी वाशिम जिल्हा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प समावेश संघर्ष समितीचे संयोजक व निमंत्रक हरिष सारडा यांनी नागपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेच्या मार्फत केली आहे.
महाराष्ट्रात वाशिम जिल्हा हा कुपोषित जिल्हा आहे. सिंचन व्यवस्था शुन्य आहे. त्यामुळे याभागातील शेतकरी हि कुपोषितच असल्यासारखा आहे. वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात जर वाशिम जिल्ह्याचा समावेश केला, तर भावी पिढिला याचा लाभ होईल. जिल्हा सुजलाम..सुफलाम होईल, असे हि सारडा यांनी सांगितले.
गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे १.५ मिटरने उघडण्यात आले होते. तेव्हा नदी पात्रात ८ हजार क्युमेक्स इतका विसर्ग सोडण्यात आला. म्हणजेच साधारण एका दिवसात ६९१ एमएम.३ (द.ल.घ.मी.) पाणी वैनगंगा, प्राणहिता व गोदावरी मार्गे समुद्राला मिळणार आहे. हे सर्व पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आले आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात हे पाणी अडविण्याकरिता प्रकल्प बांधण्यास भौगोलीक दृष्ट्या योग्य जागा नसल्यामुळे १९१२ एमएम क्यूब पाणी वळविण्यात येऊन नळगंगा नदीत सोडण्याकरिता वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प शासन दरबारी प्रशासकिय मान्यतेच्या प्रतिक्षेत आहे. हा प्रकल्प वाशिम जिल्ह्याच्या सिमे वरुन अवघ्या ५० मिटर अंतरावरुन जात असताना सुद्धा अधिकारी वर्गाच्या चुकीच्या नियोजनामुळे वाशिम जिल्हा वगळल्या गेला असल्याचा घनाघाती आरोप हरिष सारडा यांनी केला आहे.
वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पात वाशिम जिल्ह्याचा समावेश ताबडतोब करावा. अन्यथा आंदोलन करणार, असल्याचा इशारा हरिष सारडा यांनी दिला. पत्रकार परिषदेला वाशिम जिल्हा वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प समावेश संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.