चार भामट्यांनी शासकीय नोकरी देण्याच्या नावाखाली घातला गंडा
नागपूर : देशाच्या राष्ट्रपती पदावर श्रीमती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या महिला विराजमान असतानाच हातावर आणून पोट भरणाऱ्या आदिवासी समाजातील युवकांना रेल्वे, स्टेट बँक, इन्कम टॅक्स, मनपा, मेडीकल रुग्णालय आदी ठिकाणी शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष दाखवून त्यांच्याच समाजातील ४ भामट्यांनी सुमारे २ कोटी रुपये लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, फसवणूक झालेल्या आदिवासी युवकांनी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही पोलिसांनी चारही भामट्यांना अद्याप अटक केलेली नाही.
याउलट मुख्य आरोपी हा पोलीस खात्यातून निलंबित कर्मचारी असल्याने पोलीस त्याला पाठीशी घालत असल्याची वास्तविकता उजेडात आली आहे. त्यामुळे हा भामटा राजकीय नेते आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची धास्ती दाखवून आदिवासी युवकांना धमकावत खुलेआमपणे फिरत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नागपुरातील बैरामजी टाऊन, खदान परिसरातील काही आदिवासी युवकांच्या गरिबी आणि बेरोजगारीचा गैरफायदा घेऊन सुनील श्रावण उईके नावाच्या भामट्याने सरकारी नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने त्यांची आर्थिक फसवणूक करण्याचा गोरखधंदा सुरू केला. या भामट्याने त्याचे ३ पुतणे मनीष भिवाजी उईके, आशीष भिवाजी उईके आणि राकेश भिवाजी उईके यांना हाताशी धरून बेरोजगार युवकांना लुबाडण्यास सुरुवात केली.
या भामट्यांनी आदिवासी युवकांना रेल्वे, स्टेट बँक, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेशन, मेडीकल रुग्णालयात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. या आमिषाला बळी पडून सुमारे २० युवकांनी मुख्य आरोपी सुनील उईके याला दीड लाख ते १० लाख रुपये दिले.
मात्र, या भामट्यांनी नोकरी देण्याच्या नावाखाली सर्वांची फसवणूक केली. पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या युवकांनी सुनील उईके आणि त्याच्या पुतण्यांकडे दिलेले पैसे परत देण्याची मागणी केली.
मात्र, या भामट्यांनी कधी टाळाटाळ तर कधी धमकावून आदिवासी युवकांना परत पाठविले. माझे राजकीय नेत्यांशी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध असून तुम्हाला माझ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायची असेल तर खुशाल करा, मला काही फरक पडत नाही, तुम्हाला पैसे परत मिळणार नाही, असे आरोपी त्यांना सांगत होता. त्यामुळे घाबरून कोणी पोलिसांकडे तक्रार करीत नव्हते.
अखेर फसवणूक झालेल्या काही युवकांनी धाडस दाखवून याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करूनही चारही आरोपींना अद्याप अटक केली नाही. त्यामुळे फसवणूक झालेले आदिवासी युवक हवालदिल झाले आहेत.
आरोपी हा निलंबित पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस त्याला पाठिशी घालत असल्याचा आरोप फसवणूक झालेले घनश्याम परतेकी , प्रदीप कश्यप, मयूर उईके, दीपक उईके, राहुल पेंदाम, राजेश कश्यप आदींनी केला आहे. या चारही आरोपींना तात्काळ अटक करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणीही या आदिवासींनी केली आहे. या प्रकरणा संदर्भात सदर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्याशी बातचित केली. त्यांनी सांगितले, की पोलीसांनी नियमानुसार कारवाई केली आहे. लवकरच आरोपिंना अटक होणार असल्याचे आश्वान PI चौधरी यांनी दिले.