ऑर्केस्ट्राचे कलावंत हे कलावंत नाहीत का?
तीस ते चाळीस वर्षांच्या कला साधनेनंतर देखील शासन दरबारी उपेक्षीत!
शासकीय योजनांमध्ये ऑर्केस्ट्रा कलावंतांना स्थानच नाही
गायन, वादन, नृत्य, मिमिक्री, निवेदन, ध्वनि व्यवस्थापन, प्रकाश योजना सांभाळणारे हजारो कलावंत नैराश्याच्या दारात!
शासनच करते कलेमध्ये भेद!
नागपूर : असे म्हणतात कलाकारांचा ना कोणता धर्म असतो ना कोणतीही जात असते, कला हाच त्यांचा एकमेव धर्म आणि पोटाची खळगी ही त्यांची खरी जात. मात्र, माय बाप शासनाने याच कलेमध्ये धोरणात्मकरित्या प्रचंड असा ‘भेदाभेद’ केल्यानेच आज लाककलावंतांच्या ओजळीत निदान मानधन तरी पडत आहे मात्र ‘ऑर्केस्ट्रा’च्या कलावंतांना कलेची कित्येक दशके साधना करुन देखील शासन दरबारी उपेक्षाच मिळाली आणि आज देखील मिळत आहे.
कलावंत हा स्वाभिमानी असतो. उमेदीच्या दिवसात तो आपल्या कलेनेच आपले आणि कुटूंबियांचे पोट भरतो व इतर गरजा पूर्ण करतो मात्र काळाचे चक्र हे नेहमी पुढे-पुढे जात असल्यामुळे काही दशकांनंतर ऑर्केस्ट्राचे हे कलावंत देखील शारीरिक, मानसिक, आर्थिकरित्या थकतात, ढासळतात. स्वतःच्या औषधोपचार किवा कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची ताकद त्यांच्या नसते, त्यामुळेच आयुष्यभर ज्यांनी कलेचीच साधना केली अश्या अनेकांच्या वाटेला, आयुष्याच्या उत्तरार्धात, जीवघेणी हालअपेष्टाच आल्याची शेकडो उदाहरणे एकट्या नागपूर शहरातच आहेत.
नागपूरात ७० च्या दशकात ऑर्केस्ट्रा ‘मयूर मिलन व तत्सम ऑर्केस्ट्राचे शोज सुरु झाले. काळ बदलत गेला व तसतशी ऑर्केस्ट्रांची संख्या ही वाढत गेली. सत्तरीचे दशक हा ऑर्केस्ट्राचा सुवर्ण काळच समजला जातो. गायक, वादक, मिमिक्री कलावंत, निवेदक, नृत्यांगना, ध्वनि व्यवस्थापक, प्रकाश योजनाकार अशी शेकडो माणसे या व्यवसायाशी जुळली, अनेकांच्या प्रपंचाचे एकमेव साधन हे ऑर्केस्ट्राचे शो हेच होते.
महत्वाचे म्हणजे ऑर्केस्ट्रा या कलाप्रकारामध्ये काही वर्षेच नव्हे तर तीन ते चार दशके आपल्या परिश्रमाची, कलेची आहूती देणारे शेकडो कलावंत आज देखील साठी आणि सत्तरीच्या उंबरठ्यावर स्वतःला कोसत कोलमडून पडली आहे! याचे कारण…. शासन दरबारी त्यांच्या या कला साधनेला न कोणती ओळख, ना कोणता मान, ना कोणतेही मानधन…..!
ऑर्केस्ट्रामध्ये जीवन घालवण्यापेक्षा त्या काळी दहावी उत्तीर्ण झालेल्यांना चक्क सरकारी नोकरी मिळत असे मात्र कलेने झपाटलेल्या असंख्य अवलियांनी सरकारी नोकरीकडे पाठ फिरवून ऑर्केस्ट्रांमध्ये गाणे वाजवणे, नृत्य सादर करने अश्या कलेतच समाधान आणि पराकोटीचा आनंद मानून घेतला. आज मात्र त्या त्यागाचे फळ हे फार-फार कटू झाले आहेत त्यांच्यासाठी. मागे वळून बघितल्यास एक कलाकार म्हणून समाजात फक्त मानाचे स्थान त्यांना प्राप्त झाले आहे, या सन्मानाने पोटाची खळगी भरता येत नाही किवा औषधे ही विकत घेता येत नाही.
राजेश ढाबरे, कस्टम कमिशनर, चेन्नई

