विदर्भासह राज्यात पावसाचा रेड अलर्ट !
नागपूर : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काल हवामान खात्याने पुन्हा राज्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला, तर मुंबईला ऑरेंज अलर्ट असून, या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली होती. बुधवार २६ जुलै सकाळी दिलेल्या अंदाजात बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अजूनही तसेच असल्याने पुन्हा एकदा पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
विदर्भाचा काही परिसर वगळता बुधवार २६ जुलै रोजी मुंबई, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग याठिकाणी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार २७ जुलै ते ३० जुलैपर्यंत मुंबईसह, कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यात कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अतिवृष्टीने तांडव केला. त्यामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडून निघाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. परिणामी दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत.
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवार २६ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागांना ऑरेंज अलर्ट आहे. तर २७ जुलैला पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्यासह विदर्भातील अमरावती, यवमतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टचा इशारा हवामान खात्या तर्फे देण्यात आलेला आहे.