राज्यात दलित सुरक्षित नाहीत; हेच काय ‘अच्छे दिन वाली सरकार…?’ – डॉ. नितीन राऊत
श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना मारहाण, डॉ. राऊतांची राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका
नागपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात चोरीच्या संशयावरून चार दलित शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या घरातून नेण्यात आलं आणि कपडे काढून त्यांना झाडाला उलटे लटकवून अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. केवळ चोरी केल्याच्या संशयावरून अशा प्रकारे कायदा हातात घेण्याचा अधिकार यांना दिला कोणी? राज्य सरकारला राज्यात वर्णव्यवस्था आणायची आहे? पण काँग्रेस पक्ष ते होऊ देणार नाही. या देशातील दलित, वंचित यांच्या हक्कासाठी काँग्रेस पक्ष, धर्मांध राज्य शासनाच्या विरोधात लढत राहील.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय ‘अच्छे दिन वाली सरकार…?’ या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हा जातीभेद संपणार कधी? असा प्रश्न करीत राज्याचे माजी मंत्री व नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राज्य शासना विरुद्ध घणघणीत टिका केली.
मोलमजुरी करुन आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या शालेय दलित विद्यार्थ्यांना चोरीच्या संशायावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे चार दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली. हे तरूण आणि त्यांचे कुटुंबीय मोलमजुरी करून आपली उपजीविका करतात.
सध्या नुकताच सोशल मीडियावर एका मुस्लिम विद्यार्थ्याला त्याच्या शाळेतील वर्गमित्रांकडून कानाखाली वाजवण्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाळेतील शिक्षिकाच मुस्लिम विद्यार्थ्याला आक्षेपार्ह बोलताना दिसत आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशातून संतापाची लाट उसळली असताना आता चार दलित तरुणांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भारतीय जनता पार्टी द्वारे सातत्याने करण्यांत येणारे घृणित राजकारणाचा परिणाम आहे. घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे देशात जातीय अत्याचाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे, असे ही यावेळी डॉ. राऊत म्हणालेत.
संबंधित घटनेतील पीडित तरुण शुभम माघाडे, कुणाल मगर, ओम गायकवाड व प्रणय खंडागळे यांना जबर मारहाण करण्यात आली. यातील काही अल्पवयीन व दलित समाजातील आहेत. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींच्या मुसक्या आवळ्याव्या व तात्काळ अटक करून या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करुन कठोर कारवाई करावी तसेच पिढीतांना संरक्षण द्यावे, त्यांच्या शिक्षणाच्या खर्च शासनाने वहन करावा व पिढीतांना शासकीय नोकरी मिळून देण्याची हमी द्यावी.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्या राजवटीत राज्यात दलित सुरक्षित नाहीत. हेच काय ‘अच्छे दिन वाली सरकार…?’ या घटनेवरून राज्यात जातिभेद ठळकपणे दिसून येतो. हे कृत्य मानवतेवरील कलंक आहे. याप्रकरणी दलित तरुणांना मारहाण करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी. या घटनेबद्दल महाराष्ट्रासह तमाम देशवासीयांच्या भावना अत्यंत तीव्र असून डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या तीव्र शब्दात निषेध नोंदविला. सरकारने याकडे गांभीर्याने पाहावं. अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी पत्रा द्वारे डॉ. राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना केली आहे.