“मेरी माटी, मेरी देश” अभियान राष्ट्र प्रथम ही भावना जागृत करण्यास प्रेरक!
वने, संस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
वीर अमर जवानांच्या गावातील मातीस केले अभिवादन नमन
छत्रपती संभाजीनगरच्या उमेश जाधव यांच्या उपक्रमाचे कौतुक
मुंबई : “देशातील १८५ वीर अमर जवानांच्या गावी जावून त्यांच्या अंगणातील पवित्र माती कलशात एकत्र करणाऱ्या व राष्ट्रभक्तीतून जगावेगळी धडपड करणाऱ्या उमेश गोपीनाथ जाधव या छत्रपती संभाजी नगरच्या तरुणाचा उपक्रम अभिनंदनीय, प्रेरणादायी आणि अनुकरणीय असून “मेरी माटी, मेरी देश” या विश्वगौरव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या अभियानाला मिळत असलेला प्रतिसाद ” राष्ट्र प्रथम” ही भावना जागृत करण्यास प्रेरक ठरत आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. श्री उमेश जाधव यांच्याकडून एकत्रित अमर जवानांच्या गावातील माती कलशाचे पूजन व अभिवादन करून ना. मुनगंटीवार यांनी त्यांच्या मलबार हिल येथील शासकीय निवासस्थानाहून दिल्लीकडे रवाना केली; यावेळी ते बोलत होते.
ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले, “मेरी माटी, मेरा देश” या अभियानास देशभरात उत्तम प्रतिसाद मिळत असून सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील एक हजार कुंभ घेऊन शुक्रवारी तरुण बांधव मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र जमणार आहेत. संस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यावेळी उपास्थित राहणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजीनगर येथील उमेश जाधव यांनी एक लाख 30 हजार किलोमीटर प्रवास करून, अमर जवानांच्या गावी जाऊन माती एकत्र केली हे देशभक्तीचे अनोखे उदाहरण आहे. या त्यांच्या उपक्रमात सहभागी होताना विशेष अभिमान वाटत आहे, असेही ना. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
शाहिद अमर जवानांच्या कुटुंबियांना भेटून ही माती जमविण्यासाठी मी देशभरात फिरलो, प्रत्येक ठिकाणी वेगळे अनुभव आले; शाहिद विधवांच्या डोळ्यातील विश्वास आणि देशभक्ती बघून अधिक प्रेरणा मिळत गेली. माझे सर्वांनी स्वागत केले. महाराष्ट्रात ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात व्यक्त केलेली संवेदनशीलता आणि सहकार्यांची भावना बघून अतिशय भावूक झालो आहे. त्यांचे प्रेरक वक्तव्य आणि देशभक्तीने ओतप्रोत विचार मला नवी ऊर्जा देवून गेलेत अशी प्रतिक्रिया उमेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केली. दिल्ली येथे लष्कर मुख्यालयात ही माती अमृत वाटिकेसाठी देण्यात येईल असे जाधव यांनी सांगितले.


