आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या सारथी सोडून गेला – डॉ. नितीन राऊत
माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनावर व्यक्त केला शोक
नागपूर/मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार उपेंद्र शेंडे यांचे आज पहाटे निधन झाले आहे. यांच्या निधनाबद्दल काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. शेंडे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या सारथी सोडून गेला, अशा शब्दात डॉ. राऊत यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपेंद्र शेंडे ७४ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. वर्ष १९९० मध्ये त्यांनी उत्तर नागपूर मतदार संघातून निवडणूक जिंकली. वर्ष १९९३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठ नामांतर लढ्यात यांचे मोठे योगदान राहिले आहे. शेंडे यांनी केलेल्या लढ्याने चळवळीचे स्वरुप घेतले आणि ही चळवळ चालवण्यात आणि नामांतराची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला बाध्य करण्यात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे डॉ. राऊत यांनी म्हंटले आहे.
शेंडे यांच्या निधनाने कार्यकर्त्यांमध्ये जाज्वल्य स्वाभिमान पेरणारा नेता हरपला असून आंबेडकरी चळवळीतील एक लढवय्या सारथी सोडून गेला असल्याचे डॉ. राऊत म्हणालेत.